सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा नगरपंचायत हद्दीमध्ये प्रभाग सात मध्ये अतिवृष्टी काळात ओढयाचे पाणी घरामध्ये घसून आर्थिक नुकसान होत असून नगरपंचायतीने पैसा खर्च करून अर्धवट बंदिस्त गटर बांधकाम सोडल्याने गटर शोपीस ठरत आहे. या गटरला आडकाठी ठरत असलेली छोटी भिंत पाडून गटर पुर्णत्वास न्यावे अशी मागणी डॉ. संपतराव कांबळेसह इतर रहिवाशींनी पत्रकार परिषदेत केली आहे.
प्रभाग ७ मध्ये डॉ. संपतराव कांबळे, अमोल चव्हाण, राजेंद्र मुळे आदींची घरे आहेत. या घरांमध्ये सन २०२१ मध्ये ओढयाचे पाणी घुसुन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. प्रति वर्षी पावसाळ्यात अशा संकटांचा सामना लोकांना करावा लागत आहे. याबाबत नगरपंचायत कार्यालयात अर्ज, विनंत्या करून ही नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी हलगर्जी पणा केला असल्याचा आरोप डॉ. कांबळे यांनी यावेळी केला.
नगरपंचायतीने अमोल चव्हाण ते तरडे यांचे घरापर्यंत बंदिस्त गटर बांधकाम केले आहे. परंतु पुढील गटर बांधकाम अर्धवट सोडलेले आहे. चिकणे यांनी बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह थांबला आहे. ती संरक्षण भिंत काढून अर्धवट गटर बांधकाम पुर्णत्वास नेवुन सातारा महाबळेश्वर रस्त्याच्या गटर मध्ये सोडावे म्हणजे आम्हा रहिवाश्यांचा काही अंशी त्रास कमी होईल अशी मागणी यावेळी रहिवाशांनी केली.
नगर पंचायतीच्या वेळखाऊ पणामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होत असून गटर बांधकाम करून सुद्धा त्याचे पाणी बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने रोगराई पसरून येथिल रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. चिकणे यांची गटरसाठी अडथळा ठरणारी संरक्षण भिंत काढून गटर करावे. तसेच ओढयाचे पाणी घरामध्ये घुसत असल्याने त्याचाही बदोबस्त करावा अशी मागणी डॉ. संपतराव कांबळे, अमोल चव्हाण, राजेंद्र मुळे आदींनी यावेळी केली. सामान्य जनतेच्या आर्थिक नुकसानीबाबत व आरोग्य बाबत नगरपंचायतीने योग्य उपाययोजना करावी अशी ही मागणी करण्यात आली.