पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर गावातील कन्यांनी कबड्डीच्या मैदानावर आपली छाप उमटवत संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला आहे. जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सासवड येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात राजगड ज्ञानपीठ भोर संचलित सद्गुरु श्री नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाने अत्यंत दमदार खेळ करून प्रथम क्रमांक पटकावला. हा विजय शालेय जीवनात ऐतिहासिक ठरला असून नारायणपूर पंचक्रोशीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
फायनल सामन्यात नारायणपूरच्या कन्यांनी चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांना चित्तथरारक झुंज देत पराभूत केले. त्यांच्या संघभावना, शिस्तबद्ध खेळ आणि जिद्दीमुळे उपस्थित प्रेक्षकांनीही जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
स्पर्धेनंतर पुरंदर हायस्कूलचे प्राचार्य सय्यद इस्माईल, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद कारकर तसेच क्रीडा शिक्षक बाळासाहेब झेंडे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या विजयामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक राम चौगुले, शिक्षक भगवान घोळवे यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान राहिले. सततच्या सराव, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळे मुलींनी हे यश संपादन केले. त्यामुळे विद्यालयाचे नाव तालुक्यात गौरवाने उच्चारले जात आहे.
या शानदार कामगिरीनंतर शाळेतील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजगड ज्ञानपीठ, भोर संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार संग्राम थोपटे, उपाध्यक्ष पृथ्वीराज थोपटे, सचिवा स्वरूपा थोपटे व विशेष कार्यकारी अधिकारी रामचंद्र थोपटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत पुढे जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अशीच उत्तुंग कामगिरी करावी, असे आशीर्वाद दिले.
तसेच नारायणपूर, पेठ, पोखर व चिव्हेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर भरत क्षीरसागर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव बोरकर, सरपंच प्रदीप बोरकर, सामाजिक कार्यकर्ते राम बोरकर, सरपंच चंद्रकांत बोरकर, सोपान आबा बोरकर यांच्यासह समस्त ग्रामस्थांनीही या विजयी कन्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव केला. टेंभे स्वामी यांनीही नारायणपूरच्या मुलींना भरभरून आशीर्वाद देत त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले.
नारायणपूरच्या कन्यांनी या विजयातून दाखवून दिले की जिद्द, मेहनत आणि एकजुटीच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते.