सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने नीरा नदी प्रणालीतील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आज दि. २४ रोजी सकाळपर्यंत नीरा प्रणालीतील एकूण धरणसाठा ७८ टक्क्यांवर पोहोचला असून, प्रमुख वीर धरण दुसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे. तसेच पावसाचा जोर अजून सुरू असल्याने नीरा देवघर ७६ टक्के, भाटघर ७० टक्के तर गुंजवणी ८१ टक्क्यांवर पोहचले आहे.
त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वरच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी आणि वीर या धरणांमध्ये सातत्याने पाण्याची आवक वाढत आहे. परिणामी, जलसाठ्यात दिवसागणिक वाढ होत असून सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसही घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता असून, आवश्यकतेनुसार धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो.
दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्यास नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
